महाबळेश्वर, दि. २४ (प्रतिनिधी) : समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर महाबळेश्वर शहर वसलेले आहे. एवढ्या उंचीवर असणाऱ्या या शहरात विविध जाती धर्मातील लोक आनंदाने व प्रेमाने राहतात. देशात व राज्यात कधीही धार्मिक तेढ निर्माण होऊन वेगळे वातावरण तयार झाले तरी महाबळेश्वर मध्ये याचे काही परिणाम होत नाहीत. कारण महाबळेश्वरमध्ये ऐक्य व धार्मिक सलोखा हाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी केले.

महाबळेश्वर गिरीस्थान नगर पालिकेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक कुमार शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. निवडणूक प्रचारार्थ नागरिकांशी भेटीगाठी दरम्यान संवाद साधत असताना ते बोलत होते.

कुमार शिंदे पुढे म्हणाले, महाबळेश्वर मध्ये हिंदू , मुस्लिम, सिख, ईसाही, जैन, विविध मागासवर्गीय समाज आदी विविध जाती धर्मातील लोक राहतात. येथे दिवाळी मोठ्या आनंदाने, गुन्यागोविंदाने साजरी होते. त्याच पद्धतीने ईद देखील साजरी केली जाते. ख्रिसमसला (नाताळ) तर संपूर्ण भारतातून लोक येथे फिरावयास येतात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

राजकारण्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केवळ विकास करणे हेच उद्दिष्ट नसून बंधुभाव टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महाबळेश्वर मधील ऐक्य व जातीय सलोखा कायम टिकवून ठेवणे हे माझे महाबळेश्वर वासियांना वचन असल्याचे कुमारभाऊ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी कुमारभाऊ शिंदे यांनी गेल्या कार्यकाळातील विकास कामांचा आढावा नागरिकांपुढे सादर केला. मागील पंधरा वर्षात नव्वद टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण हीच आपल्या कामाची पद्धत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महाबळेश्वर मधील व्यापारीबांधव, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page