सातारा:फॉरेस्ट कॉलनी ते गोडोली नाका दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि दुभाजकाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत, ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा ३० तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड (गरुडा) यांनी दिला आहे.
फॉरेस्ट कॉलनी ते गोडोली नाका या मार्गावर सध्या ‘ए.एस. कन्स्ट्रक्शन’ मार्फत रस्ता दुभाजक व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना तांत्रिक निकषांना पूर्णपणे हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. संघटनेने प्रामुख्याने खालील मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
तांत्रिक अनियमितता: रस्त्याची जी.एस.बी. (GSB) प्रक्रिया नियमानुसार झालेली नाही. ग्रेड १ आणि ग्रेड २ चे निकष पाळले नसून, १३० एमएम खोदाई व ०.७५ सेकंड लेयरच्या कामात मोठी अनियमितता आढळली आहे.
निकृष्ट साहित्य: रस्ता मजबुतीकरणासाठी मुरूम वापरण्याऐवजी मोठ्या प्रमाणात मातीचा वापर केला जात आहे. तसेच, कामावर आवश्यक असलेले पाणी मारले जात नाही.
नियोजनाचा अभाव: रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांच्या पाण्याचा निचरा न करताच काम रेटले जात आहे. तसेच, रस्त्यातील विद्युत खांब आणि जाहिरात फलक न काढताच घाईघाईने काम उरकले जात असल्याने भविष्यात अपघाताचा धोका वाढला आहे.
“लोकांच्या करातून जमा होणाऱ्या पैशांची ही उधळपट्टी आहे. ए.एस.कन्स्ट्रक्शनला कोणतेही बिल अदा करू नये आणि त्यांना तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे. तसेच, या भ्रष्ट कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करावे. प्रशासनाने दखल न घेतल्यास होणाऱ्या तीव्र परिणामांना प्रशासन जबाबदार राहील.”— आदित्य गायकवाड (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना, सातारा)
प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कामाची सखोल चौकशी न केल्यास आणि दोषी ठेकेदारावर कडक कारवाई न केल्यास, येत्या ३० तारखेला ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी निवेदन देऊन प्रसारण माध्यमाची बोलताना त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष व सातारा शहराध्यक्ष व ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते