
सातारा : महायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणार्या आमच्याच महायुतीच्या आमदारा विरोधात आता आम्ही सर्व शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. यापुढील काळात आमदाराच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये. अन्यथा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक जशास तसे उत्तर देईल, असा इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या सांगता सभेत दिला.
यावेळी संजयसिंह देशमुख, भूषण शिंदे, बाळासाहेब जाधव, उमेश बोडरे, विजय चव्हाण, लक्ष्मण तात्या जाधव, गणेश जाधव, योगेश भैया परदेशी, संदीप चव्हाण, सचिन देशमाने, सनी भंडलकर, सुनील बोडरे, अभिजीत बोडरे, प्रशांत वायदंडे, नौशाद शेख व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते लोणंद शहरातील 56 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेना महाबळेश्वर संघटक संजयसिंह देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी वाई मतदार संघासाठी दिला आहे. मात्र आमदार हा निधी मी स्वतःच आणला असल्याचा खोटा आव आणत आहेत. महायुतीमध्ये शिवसैनिकांना कोणतेही स्थान आणि कामगार देत नसल्यामुळे आम्ही आमचा हक्काचा आमदार वाई, खंडाळा, महाबळेश्वर मधून निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी शिवसेना खंडाळा तालुकाप्रमुख भूषण शिंदे म्हणाले, आम्ही महायुतीचा धर्म पाळून काम करीत आहोत. मात्र वाई, खंडाळा, महाबळेश्वर चे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी दडपशाही व गुंडगिरीच्या माध्यमातून लोणंद येथील विकास कामांना विरोध करण्याचे तंत्र राबवल्यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये आणि लोणंद नागरिकांचा विद्यमान आमदाराविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील यांनी लोणंद शहरातील विकास कामाबाबत शासकीय अधिकारी व शिवसेना पदाधिकार्यांना दडपशाही व गुंडशाहीचा वापर सुरू केल्याने आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो.दरम्यान 3 ऑक्टोबर पासून क्षेत्र महाबळेश्वर येथून सुरू झालेली जनसंवाद यात्रा महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातून 138 गावात पोचली व घरोघरी पुरुषोत्तम जाधव यांनी जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या जनतेसमोर यात्रेचा समारोप खंडाळा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी येथे करण्यात आला.
यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
138 गावात पोहचली पुरुषोत्तम जाधव यांची जनसंवाद यात्रा
वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील 138 गावात व वाडी वस्तीवर प्रत्यक्ष जाऊन नागरिक महिलांचे प्रश्न जाणून घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचे व विविध योजनांची माहिती सर्वांना दिली. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भगवे वादळ वाई खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात पाहायला मिळाले.
